Monday 13 April 2020

थोडा विचार 'करो ना' लॉकडाउन दिवस तेरावा ..5/4/2020

आज एक गोष्ट वाचनात आली. काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका राजाला मूल नव्हते. तो राजा म्हातारा झाला होता. त्यामुळे त्याच्या नंतर राज्याचा वारस कोण असेल याची चिंता त्याला लागली होती. राजा विचार करत होता कोण उत्तराधिकारी असेल. त्याने उत्तराधिकारी निवडण्यासाठी एक पद्धत ठरवली. राजाने घोषणा केली की, एके दिवशी संध्याकाळी एका विशिष्ट वेळी त्याला जो कोणी भेटेल त्याला आपल्या राज्याचा हिस्सा देईल. या पद्धतीने तुम्हाला जो भेटेल त्या व्यक्तीला राज्याचा हिस्सा कसा काय दिला जाऊ शकतो या घोषणेमुळे प्रधानमंत्री आणि त्याच्या दरबारातील अनेक मंत्री नाराज झाले. अशा पद्धतीने तर राज्य हे विखुरले जाईल अशी त्यांची भावना होती. राजाची घोषणा त्यांना अव्यवहारिक वाटत होती. पण, सर्वांना राजाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास असल्यामुळे त्यांनी राजावर विश्वास ठेवला.

ठरलेल्या दिवशी राजाने त्याच्या महलाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जत्रा, नाच-गाण्याचे कार्यक्रम आणि भोजन, मद्याची व्यवस्था केली. मनोरंजनासाठी सर्व सोय त्या भागात केली. त्या दिवशी राजाला भेटायला जे लोकं आली होती ती जाताना त्या कार्यक्रमात गुंतली. काही लोक नाच-गाणं बघू लागले तर काही मद्य पिऊ लागले. काही लोक तर इतके हरवून गेले की राजाला भेटायचं विसरूनच गेले, पण काही युवक असे होते की त्यांनी या गोष्टींकडे पाहिलं पण नाही. ते सरळ महालाकडे निघाले. त्यातला एक तरुण हा सरळ महालाच्या दरवाजाकडे गेला तिथं द्वारपालाने त्याला रोखलं.

त्या तरुणाने द्वारपालाला धक्का देऊन तो सरळ महालात घुसला. तो राजाला योग्य त्या वेळेतच भेटण्याचं ध्येय घेऊन आला होता. महालात त्याला राजा समोरच दिसला. राजाने त्याचे स्वागत स्वत:हून केले आणि म्हणाला, माझ्या राज्यात अशीही व्यक्ती आहे जो प्रलोभनांमध्ये अडकून न पडता आपल्या ध्येयावर ठाम राहिला. राजा म्हणाला, तू माझा उत्तराधिकारी बनण्याच्या योग्यतेचा आहेस. यामुळे तुला पूर्ण राज्य मिळेल. जोपर्यंत बाकीचे लोक दरवाजापर्यंत पोहोचले तोपर्यंत राजाने दिलेली वेळ निघून गेली होती, द्वाररपालांनी त्यांना परत पाठवून दिले.
या गोष्टीतुन बोध असा - कोणत्याही कामात तोच यशस्वी होतो जो आपल्या ध्येयावर ठाम राहतो आणि वाटेत येणाऱ्या संकटांचा सामना करतो, तसेच छोट्या-मोठ्या प्रलोभनांकडे दुर्लक्ष करतो.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करूया.. जीवनावश्यक वस्तू कणभरही वाया न घालवता अगदी जपून वापरूया, घरात म्हणजे घरातच राहूया, एकाच्या तरी मुखी एक छोटा घास पडेल इतपत हातभार यंत्रणेला लावायचं कुटुंबातल्या प्रत्येकानं ठरवूया आणि पारही पाडूया. कुठल्यातरी माध्यमातून हे कर्तव्य बजावणं अजिबातच कठीण नाही. इच्छा असेल तर जरासं शोधलं कि मार्ग सापडतोच.. फक्त हा मार्ग घरात बसून फोन, इंटरनेट अश्या माधमांतून जाणून घेऊया आणि आपल्या आजूबाजूलाच जर कोणी असेल तर योग्य ती काळजी घेऊन थेटच मदत पोचवूया. मन:स्वास्थ्य राखूया, प्रार्थना करूया,आपल्याकडून नियम न तोडता जे करता येईल ते सगळं करूया.
संकटाचा सामना करण्यासाठी ध्येय गाठण्यासाठी
लक्ष केंद्रित करतोय का? थोडा विचार 'करो ना'...
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment