Thursday 28 September 2017

सप्तसूर .........

  सप्तसूर  .........
    एक धागा सुखाचा', 'एकवार पंखावरूनी', 'जीवनात ही घडी', 'ऐरणीच्या देवा तुला', 'मानसीचा चित्रकार', 'सूर तेच छेडीता', 'हे चिंचेचे झाड', 'धुंदी कळ्यांना', 'स्वप्नात रंगले मी', 'मला लागली कुणाची उचकी', 'गोमू संगतीनं', 'फिटे अंधाराचे जाळे' ही आणि याहीपेक्षा खूप खुपसारी सुंदर सुंदर गाणी आपण ऐकतो, म्हणतो आणि जीवनाचा खूप आनंद घेतो पण हि गाणी ज्या सात सुरांतून आलीत त्या भारतीय संगीतात सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत आपण कधीही विचार केलाय? संगीतात सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं 'केसराचा पाऊस' ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं .....

    मोर षड्ज सुरात तर चातक ऋषभात ... बकरा गांघार तर कोकीळ पंचम बोलतो. बेडूक व क्रौंच मध्यम, धैवत तर हत्ती नाकातून निषाद स्वराचं उच्चारण करतो .... असा त्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे ...
सृष्टीतील पशु पक्ष्यांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा …. आम्रमंजिरी पाहून कुहूकुहू करणारा कोकिळ , ढगांना पाहून आनंदून जाणारा पपीहरा ह्यांच्यापासून तो आपल्या भावना सुरांत व्यक्त करायला शिकला असावा …

" कोकिळ कुहूकुहू बोले, तू माझा तुझी मी झाले "
" अम्बुवा कि डाली पे बोले रे कोयलिया "
" बोले रे पपीहरा, पपीहरा "
" बदल घिर घिर आये , पापी पपीहरा गये "
" सा रे ग म प ध नी सा "

    सुरांची दुनिया. सातंच सूर .... तरीही केवढं प्रचंड सामर्थ्य आहे या सप्तसुरांमध्ये. प्रत्येक सुराचा बाज वेगळा, पोत वेगळा. पण जे काही आहे ते सारं फक्त जणु ह्या सात सुरांमध्येच एकवटलंय. अवघं ब्रह्मांडच समावलंय ह्या सप्तस्वरांमध्ये.
Sound is a form of energy आणि म्हणुनच हे सूर जेव्हा संगीत सम्राट तानसेनच्या कंठातून येतात तेव्हा विझलेले दिवे देखील परत पेटतात.
"झगमग झगमग दिया जलाओ "
तानसेनचा मल्हार राग ऐकायला आकाशात कृष्णमेघांची दाटी होते आणि भारावुन जावुन ते अवेळी बरसु लागतात.
" गरजत बरसत सावन आयो रे "

    असा हा सारा ह्या सात सुरांचा प्रभाव. कधी सूर आश्वासक बनुन आपल्या मनाला आधार देतात ... मनाचं मरगळलेपण घालवुन नवचैतन्य निर्माण करतात ... जेव्हा एखादीचं मन उदास, निराश असतं तेव्हा तिची मैत्रीण तिची समजुत काढताना तिला सांगते
" जब दिल को सतावे गम ,
तु छेड सखी सरगम ,
बडा जोर है सात सुरों में
बहते आंसु जाते हैं थम
तु छेड सखी सरगम "

हे सूर जेव्हा आतून, अगदी आतून येतात तेव्हा मनाची तार छेडतात …. आणि अश्रूंच्या रूपाने डोळ्यांवाटे ओघळतात
" है सबसे मधुर वो गीत जिसे
हम दर्द के सूर में गाते है
जब हद से गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं "

मनातील प्रत्येक भावना सुरांवाटे व्यक्त होत असते ….
कधी सूर छेडले असता छानसे गीत उमटते
" सूर तेच छेडिता गीत उमटले नवे
आज लाभले सखी सौख्य जे मला हवे "

सूर जेव्हा गीतांशी हात मिळवणी करतात तेव्हा जन्मतं संगीत.
"तेरे सूर और मेरे गीत
दोनों मिलकर बनेगी प्रीत"

गीत मनाचे दरवाजे उघडतं तर संगीत सरळ आत्म्यालाच जावुन भिडतं ....
आत्म्याला आत्म्याची ओळख पटते आणि दोघांचे सुर जुळतात. जीवाशिवाचं मिलन होतं ...
" तु जो मेरे सूर में सूर मिलाये
तो जिंदगी हो जाये सफल "

आणि जिथे सूर जुळतात तिथे मग भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची गरज भासत नाही ….
" सुरावटीवर तुझ्या उमटती अचूक कशी रे माझी गझले
कशास पुसशी प्रश्न प्रेयसी तुला समजले, मला समजले "

    कधी एखाद्या एकट्या संध्याकाळी, तिन्हीसांजेला अवचित ऐकू आलेली एखादी सुरावट त्या साऱ्या आठवणी जिवंत करतात , दोघांना एकत्र पाहून कुजबुजणाऱ्या वेली, खाणाखुणा करणारी पाने, सारे सारे आता स्तब्ध झालेले असतात … तारे उदास असतात अन वारा देखील उसासे देत असतो
" स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी
निर्जीव उसासे वाऱ्यांचे, आकाश फिकटल्या ताऱ्यांचे
कुजबुज ही नव्हती वेलींची, हितगुज ही नव्हते पर्णांचे "

पण जर ह्याच सुरांनी आपल्याशी कायमची फारकत घ्यायचं ठरवलं तर ? जगण्याचा उद्देशच नाहीसा होईल . आयुष्य भकास , अर्थहीन होईल ...
" सुर ना सजे क्या गाऊ मैं
सुर के बीना जीवन सुना"

अशी गत होईल आपली.
सूर आपल्याला आयुष्य रसिकतेने जगायला शिकवतात, कल्पनेची भरारी घ्यायला शिकवतात , ईश्वराच्या सान्निध्यात घेवुन जातात ….
" संगीत मन को पंख लगाये
गीतों से रिमझिम रस बरसाये
स्वर की साघना परमेश्वर की" ......

ह्या सप्तस्वरांनी आपलं जिवन किती समृद्ध केलंय नाही. जो सुरांच्या दुनियेत रमतो, जगतो तोच 'त्याला' खर्‍या अर्थाने जाणतो. अमृत प्राप्ती साठी फार काही नाही फक्त सुरांच्या सान्निध्यात राहणं गरजेच आहे ….


Wednesday 27 September 2017

Thank You बाबा .......

Thank You बाबा .......

देताना जन्म आईने सोसावी कळ
मरण सोपं व्हावं म्हणून बापाची आयुष्यभर धडपड
असेच धडपड करणारे बाबा प्रेमळ आई...... आई बाबा म्हणल, की तुमच्या माझ्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय नुसता शब्द उच्चारला तरी प्रेम, माया, ममता, करुणा, शिस्त, कठोरता, नियमबद्धता, अश्या कितीतरी भावनांचा मिलाप म्हणजे आई -बाबा त्यांच्याविषयी बोलतांना वेळ शब्द इतकंच नाही तर भाषाही अपुरी पडेल. पण आज मी बाबांविषयी बोलणार आहे हो बाबा खरंतर तुमच्याशी बोलणार आहे. काही वर्षापूर्वी मी कॉलेजला बसले असतांना एक मैत्रीण अचानक माझ्या समोर आली आणि मला म्हणाली " पूजा आता आपलं कॉलेज संपेल अग, मला एक कविता लिहून हवी होती तुझ्याकडून देशील ?
मी नेहमीप्रमाणे कुठलाच विचार न करता होकार दिला आणि चटकन तिला विषय विचारला तीन हळूच सांगितलं "बाबा"
कोणतीही मुलगी बाबांविषयी बोलतांना लिहितांना हळवी नाही झाली तर विचारा?
तशी मीही झालेच प्रिंटाऊटच पाठकोर पेज घेतलं पेन होताच हातात जे मनात येईल ते लिहीत गेले

बाबा म्हणजे शिस्त- प्रत्येक वेळी त्यांच्या कृतीतून जाणवणारी.
बाबा म्हणजे- न दिसणार न समजणार असीम प्रेम मी आजारी पडल्यावर त्यांच्या डोळ्यात जाणवणार.
बाबा म्हणजे- विश्वास मुलीला मुलाप्रमाणे वाढवणारा.
बाबा म्हणजे- व्यवस्थितपणा पुस्तकाला कव्हर लावण्यापासून तर बेडवर चादर सुरकुत्या न पडू देता कशी घालावी ते सांगणारा.
बाबा म्हणजे- आदरयुक्त भीती नुसत्या त्यांच्या घराकडे येणाऱ्या बुटांच्या आवाजानेच, पुस्तक घेऊन बसवणारी.
बाबा म्हणजे- सळसळत चैतन्य कधीही कोणत्याच संकटाला न घाबरणार कधीही न डगमगणार.
बाबा म्हणजे- स्वयंसेवक स्वतःच्या स्वार्थाकडे न पाहता समाजहितासाठी जगणारे झटणारे आणि आम्हालाही तशीच सवय लावणारे उत्तम स्वयंसेवक

मी लिहीत होते आणि पेजेस संपत होती. केवळ बाबा म्हणजे या पुढील वाक्यानेच अवघी तीन-चार पेजेस संपली होती.  मग मैत्रिणीला कविता द्याची आठवण झाली आणि जे काही लिहिलं ते असं...  प्रथम माझ्या बाबांसाठी, आणि नंतर जगातल्या सर्वांच्या बाबांसाठी.....

बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।
बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।
खोटं नाही तर सगळं खरं खरं सांगायचंय
आजवर मी कधीच नाही बोलले तुम्हाला
तो प्रत्येक शब्द मला आज सांगायचाय
बाबा आज तुमच्याशी थोडं बोलायचं ।।१।।

बाबा मी आईच्या कुशीत झोपायचे, पण मऊ भात तुम्हीच भरवायचे
दिवसभर आई खेळवायची पण बाबा खेळणी तर तुम्हीच आणून दिलेली असायची
त्या खेळण्यातील एक एक खेळणं बाबा आजही मला आठवतंय
म्हणून बाबा आज थोडं तुमच्याशी बोलायचं।।२।।

बाबा खूप मेहनत केलीत तुम्ही आजपयेंतच्या आयुष्यात
प्रत्येकासाठी सुखाची काळजी प्रत्येकवेळी केलीत तुम्ही
तुम्ही केलेल्या कष्टाचे मोजमाप बाबा कधीच नाही हो होणार
पण तुम्ही दिलेल्या संस्कारांची जाण बाबा आम्ही कधीच नाही विसरणार
त्याच संस्कारांची जाण ठेऊन बाबा आज थोडं बोलायचं ।।३।।

तुमची कर्तव्य पार पाडण्यात बाबा, तुम्ही कधीच नाही हो चुकलात
हो पण त्यावेळी कदाचित आम्हाला वेळ देऊ नाही शकलात
हरकत नाही आता तुम्हाला कामातून वेळ मिळणार आहे
आणि म्हणून बाबा, मी तुमच्याशी खूप खूप बोलणार आहे ।।४।।

पण बाबा तुम्हाला एक विचारू, असं का हो असत
मुलीलाच एक बाबा सोडून दुसऱ्या बाबाला बाबा का हो म्हणावं लागत?
ते दुसरे बाबा माझ्या आयुष्यात येण्याआधीच मला तुमच्याशी खूप बोलायचं
म्हणून बाबा आज तुमच्याशी खूप खूप बोलायचं ।।५।।

बाबा मी तुम्हाला वचन देते, तुमचे संस्कार मी कधीच नाही विसरणार
तुमची मान खाली जाईल, असं काम मी कधीच नाही करणार
विश्वास ठेवा बाबा, तुमची मुलगी कधीच नाही बदलणार
म्हणू बाबा या नंतरचे माझे दिवस, तुमच्या अन माझ्यासाठीचे असणार आहे
अन त्यासाठी मला फक्त तुमचे आशीर्वाद हवे असणार आहेत
आशीर्वाद हवे असणार आहेत ।।६।।

पेज संपलं आणि मी कविताही संपवली ओले झालेले माझे डोळे हळूच कोणालाही न दिसता पुसून काढले कविता परत एकदा वाचली मन भरून पावलं
खरंच माझे बाबा हिरो आहेत माझ्यासाठी प्रत्येकाचे असावेत बाबा इतकं करतात आपल्यासाठी पण आपण साधं थँक्यू देखील म्हणत नाही त्यांना ? मी घरी आले बाबांचा हसरा चेहरा पाहिला आणि मनापासून निघणारा थँक्यू शब्ददेखील तोडकामोडका वाटला
बाबा तुम्ही लेख वाचत असाल तर एक सांगेन Thank you बाबा Thank You So Much खरंच बाबा बाप माणूस असतो जगातल्या सर्वच बाबांना मनापासून धन्यवाद...... 

अनामिक (PMJ)

Tuesday 26 September 2017

प्रेम या विषयावर लिहावंसं वाटलं आज ......

   प्रेम या विषयावर लिहावंसं वाटलं आज ......
  काल एक मैत्रीणींशी खूप वेळ गप्पा मारल्या लग्न झाल्याचं सांगितलं. अभिनंदन वैगरे करून झाल्यावर काय करतात पंत आमचे विचारपूस करून ती मला म्हणाली "तुम्ही मुली असं ठरवून लग्न करूच कस शकता? बोटावर मोजता येतील इतक्याच दोन चार भेटीत, सर्वांसमवेत चहा-पोहे, अगदीच वाटलं तर लग्न ठरण्याआधी एखादा फोन या आधारावर अख्य आयुष्य कस उधळून टाकता तुम्ही?

    थोड्याच क्षणात ठरवूच कस शकता? कुणी एक व्यक्ती तुमचं आयुष्य बनून जाईल तुमचं खरं प्रेम होत त्या व्यक्तीवर लग्नानंतर? कि फक्त केलाय लग्न म्हणून निभावता सगळं?" असे एक ना अनेक प्रश्न, मी फक्त ऐकत होते तेव्हा माझा फारसा मुड नसावा बोलण्याचा पण शेवटी माणूस सवयीचा गुलाम विषय मिळाला. लिहावंसं वाटलं खूप दिवसांनी कधीही न लिहिलेल्या विषयावर. तिला उत्तर द्यायचं म्हणून नाही पण खरंच लिहावंसं वाटलं या विषयच सर्वात महत्वाचा धागा म्हणजे प्रेम....  

    प्रेम म्हणजे उत्साह, सळसळत चैतन्य, दुसऱ्याला स्वीकारण्याची असीम क्षमता, वात्सल्य, ममता, सकारात्मकता, शांत वृत्ती, एकाग्रता, आनंद, समाधान, निरागसता, निरपेक्षता, आत्म्याचा पवित्र हक्क, सुवर्ण बंधन जे कर्तव्य आणि सत्याला जोडत डोळ्यांना दिसत नाही ते आतून अनुभवत. 

     प्रेम लाभे प्रेमळाला त्याग हि त्याची कसोटी प्रेम फळासारखं असत फळ जस पक्व होत जात तसतस ते अधिक सुंदर दिसत त्याचा गाभा बी तीच असते.  पण रंग आणि पडतो तसच प्रेमाचही आहे प्रेमही परिपकव्य होत जात प्रेम सौंशय मुक्त असत, त्यागयुक्त असत, समाजाच्या सहानुभूतीच ते मुमताज नसत, प्रेम कायम उमलत असत, उपजत असत, प्रेमाशिवाय जीवन स्मशान असत, फुपाखराचं फुलावर असत, आईच बळावर असत, निसर्गाचं माणसावर असत, सावित्रीचा सत्यवानावर असत, प्रियकराचा प्रेयसीवर असत. 

Hamen tum se pyaar kitana, ye ham nahin jaanate
Magar ji nahin sakate, tumhaare bina 

    हे गाणं प्रेमाच्या व्याख्येत कधीच बसत नाही यात व्याकुळता आहे वासना आहे हव्यास आहे लोभ आहे म्हणजे प्रेम नव्हे.  लाख नुसत्या जीव घेण्या तऱ्या, प्रेमात कुणीच मरत नसत. आई वडिलांचं जस मुलांवर प्रेम असत तसच मुलांनचली खूप असत ते फक्त व्यक्त करण्याची गरज असते आपण ते व्यक्तच करत नाही का?सल्लज असत ते प्रेम अबोल असून बोलकं असत ते प्रेम.
    प्रेमात व्यक्ती जवळ असावी असं नाही प्रेमात बंधन असाव असाही नाही समजून उमजून आपोआप फुलात ते प्रेम. म्हणतात ना नात्यांची मजा ती हळुवार उलगडण्यात असते. फुलू द्या नात्यांना, उधळू द्या आसमंतात त्याची फुल. प्रेम द्या प्रेम घ्या जगातल्या प्रत्येक नात्यावर मनापासून प्रेम करा आणि सदाआनंदी राहा कारण आनंदाला विरुद्धअर्थी शब्द नाहीये....... 
अनामिक (PMJ)

Monday 25 September 2017

खोड्या करायला वय हवय कश्याला......

 खोड्या करायला वय हवय कश्याला......
    खोड्या करायला वय हवाय कश्याला असं म्हणणारे लोक फार कमी मिळतात आजकाल तुमचं वय काय हो? असे कुणी विचारले की आपली प्रतिक्रिया काय असते? मुलींना हा प्रश्न सहसा आवडत नाही. काहींना सरळ उत्तर द्यावेसे वाटेलही. जेष्ठ मंडळी लगेच मनातल्या मनात आता रिटायरमेंटला किती वर्ष राहिले बुवा आणि अजून किती ’सर्व्हिस’ शिल्लक आहे याचाही हिशोब करायला लागतात. पण वय कितीही असले तरी प्रत्येकात एक लहान मूल लपलेले असते. आता काही म्हणतील छे... काही तरीच काय? पण माझे ऐका, आता मान्य कराचच हे. तुम्ही कितीही म्हणालात तरी हे अगदी खरंय. तेच लहान मूल ज्याला कधी कधी फार खोड्या कराव्याशा वाटतात.

   कित्येकदा मला असे वाटलंय की एकदा तरी खूप जोरात ओरडून आरोळ्या ठोकाव्यात. उगाचच... काही कारण नसताना. का कुणास ठाऊक, पण वाटते. खूप मोठ्याने गाणं म्हणावं मला आवडेल तेवढं आणि तितका वेळ सध्या हि हौस मी माझ्या खोलीतच भागवून घेते ती पण खूप हळू आवाजात. मला आठवतंय दुपारच्यावेळी आई च्या चोरून बदाम गल्लीतले खुपसारे बदाम तोडायचे अगदी कच्चेसुद्धा आणि चोरी पकडल्या गेल्यावर मी नाही म्हणतं उगाचच इकडे तिकडे सैरावैरा धावत सुटायचे. आहे ना गंमत?

   कधी आपल्याला वाटतेच ना रस्त्यात उगाचच एखाद्या गाडीला ’कट’ मारावा. अचानक कुणी मधे आले आणि मूड चांगला असला की आपण ओ काका, अंग ए मावशी जरा समोर पाहा, ओ अप्पा जरा हळू असे खोडकर शब्द वापरतो. चौकातल्या पोलीसभाऊंची ची ढेरी फारच गरगरीत दिसते आणि त्यावर हळूच हात फिरवावासा वाटतो. कुणी तंबाखू चोळत उभा असला तर खालून हाताला धक्का मारावासा वाटतो.

   अजूनही किती तरी वेळा आपण कुणी बसायच्या आधी त्याची खुर्ची हळूच ओढून बाजूला करतो. खूप दिवसांनी कुणाला भेटून सरप्राईज द्यायचे असेल तर मागून जाऊन त्याचे/तिचे डोळे गच्च झाकतो अथवा "भॉ" करतो. कुणाला खाली बसताना पाहिले की च्युइंगम ठेवावेसे वाटते ना तुम्हांला.

   मी पाहिलंय कॉलेजला असताना खूप वेळा बसमध्ये सीटच्या मधून खाली येणाऱ्या मुलींच्या ओढणीने काही आगाऊ मूल स्वतःचे बूट पुसण्याचे उद्योग करायचे. किंवा शेजारी उभा असलेला माणूस तिकडे तोंड करुन उभा असेल तर हळूच त्याच्या शर्टच्या कापडाची क्वालिटी पाहून घ्यायचे.

   कधी मनात आले की आपण उगाच हॉटेलमध्ये टिश्यू पेपरचे विमान, होडी असले काही बाही बनवतो आणि मग वेटर आपल्याकडे ’जरा हाललंय’ अशा नजरेने पाहतो. काही लोकांना कितीही गंभीर सिनेमा असला तरी पॉपकॉर्नची पिशवी फोडल्याशिवाय पैसे वसूल झाल्यासारखे वाटतच नाही. चित्रपट संपल्यावर कॉरिडॉरमधून बाहेर पडताना लोक इतके गप्प गप्प का असतात हे तर मला अजूनही कोडे उलगडले नाही. अशा वेळी मला ’इतना सन्नाटा क्यू है भाई’ अशी काडी लावून खो-खो हसावेसे वाटते. बागेत गेले की कधी उगाचच झोक्यावर बसावेसे वाटते किंबहुना अशा लोकांसाठीच ’खेळणी फक्त लहान मुलांसाठी आहेत’ असे फलक लावलेले असावेत. मग आपण हिरवळीवर लोळून हौस पूर्ण करुन घेतो. बागेतला फुगेवाला फुगा फुगवत असताना त्याला गुपचुप टाचणी मारावीशी वाटते. माझी आईतर नवीन फुगे आणून स्वतः ते फुगवून फोडते खूप मजा येते तिला त्यात.

   मानवाला सततच्या आपल्या या बालसवयींची काळजी खूप प्राचीन काळापासून पडली असावी. म्हणूनच आपल्या लग्नात नवऱ्या मुलाचे कान पिळणे, बूट पळवणे, हळद खेळणे, वरमाईच्या डोक्यावर कुरड्या फोडणे  असे प्रकार शास्त्रसंमत आहेत. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातल्या सो कॉल्ड पर्सनालिटी डेव्हलपमेंटच्या गेममध्ये पण थोडा का होईना बालिशपणाचा अंश असतो. अगदी उच्च सुपरब्रॅंडच्या जाहिराती सुद्धा कित्येकदा या बालिशपणाभोवतीच घुटमळत असतात. किंबहुना अशाच जाहिराती खूप दिवस लक्षात राहतात. विश्वास नसेल तर करते आणि मनात म्हणते आठवा. टेलिव्हिजन क्षेत्राने तर आपली ही गोष्ट केव्हाच ओळखली आहे, म्हणून तर आजकाल कित्येक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी लहान मुलांवर टाकली आहे.

   लहान मुलांमध्येच आपला जीव रमतो ना अजूनही? जगरहाटीच्या रॅटरेसमधून घरी गेल्यावर आपण घरात किंवा शेजारी लहान मूल असेल तर त्याच्या बरोबर मूल होऊन खेळतोच ना? मी तरी खेळते, आणि मला लहान व्हावेसे वाटते. पण त्या आमच्या शेजारच्या लहान मुलीला  मोठे व्हावेसे वाटते. मला ऑफिसला जाताना विचारते, "ताई मला तुझ्यासारखं होता येईल का?" मी स्वतःशीच हसते. तिला बाय करते.  आणि मनात म्हणते "मला तुझ्यासारखं जगता येईल का?" मला सांगा कितीही आपण मोठे झालो तरी आपल्या जगण्याला त्या बालपणाची सर येईल का ? आपत्याला लागलेली लहापणीची कोणतीतरी सवय मरेस्तोवर जाईल का? चॅनल सर्फ करताना कार्टून फिल्म्स दिसल्यावर आपण थबकतोच ना? किती तरी वेळा कुणाशी तरी मिस कॉलचा खेळ खेळत बसतो.  तोही या पोरकटपणापायीच. मी तर आजवर अशा अगणित खोड्या केल्या आहेत, अजूनही करत आहे आणि पुढेही करत राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
आपण करता का हो अशा खोड्या? आणि करत असाल तर काय करता ते नक्की कळवा....
अनामिक (PMJ)

Sunday 24 September 2017

नाती अनमोल असतात

     नाती अनमोल असतात

       काही नाती अनमोल असतात,अशी नाती जपायची असतात. 
       काही जपूनही पोकळ राहतात तर काही मात्र आपोआप जपली जातात.
     समाजात आपला दर्जा राखून ठेवण्यासाठी आपण खूप धडपड करत असतो. त्यागडबडीत आपण धड घडतही नसतो आणि पडतही नसतो. खूप वेळेस एखादी मिळालेली जागा आपण गमवून बसतो आणि मग त्याबद्दल हळहळ व्यक्त करीत राहतो. त्याचप्रमाणे जागा हि एखादे पद असो किवा कोणाच्या मनातले स्थान असो, ती मिळवायला इतका वेळ लागतो कि आयुष्यही कमी पडते त्याच उलट ती जागा गमवायला एक क्षणही पुरेसा असतो. प्रश्न असतो विश्वासाचा, आपुलकीचा आणि भावनेचा. पण गम्मत तर इथे अशी असते कि, हि आपुलकी, भावना जपायची कुणी हा मुद्दातर फारच निराळा. असो आपण सर्वच ह्याबाबतीत जाणकार आहोतचं

      जीवनात नाती अनेक असतात पण जपणारी लोक फार कमीच असतात. काही नातं रक्ताचे असतात तर काही हृदयानेच जोडली जातात.  काही जन्मोजन्मीची तर काही क्षणापुरतीच. काही नाती झाडाच्या मुळासारखी घट्ट जमिनीत रोव्ल्यागत तर काही झाडाच्या फांदीसारखी अलगद तुटणारी. नाती हि अशी सहज रुजली जात नाहीत, तर त्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित खतपाणी आवश्यक असते. जर हे खतपाणी नियमितपणे दिले गेले नाही तर ते फार काळ तग न धरू शकत नाही.

   नात्यांचे खतपाणी हे भावनांच्या ओलाव्याने, प्रेमाने केलेल्या विचारपूसने आणि वेळप्रसंगी मदतीला धावणाऱ्या हाताच्या साह्याने बनलेल्या पाठीचा कणाप्रमाणे असते. पण इतक्याश्या साध्या गोष्टी करतानाही आपण त्यात बरेच कारणे उपस्थित करतो. हो ना? आपण ज्या हौसेने बागेची निगा राखतो, काळजी घेतो. त्याच हौसेने आपल्या जिव्हाळाच्या माणसासाठी धडपडतो का? खरच प्रश्न मनात आलाच ना? काय असावं बंर हे?

   स्वतःसाठी सुंदर घर असावे हे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांनाच वाटते. पण आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायला शिकलो कि जिथे जाऊ तिथे ते घर आपले आणि त्या घरातली माणसेही आपलीचं. खूप साधी गोष्ट वाटते ना वरवरून पण तितकाच मृगजळाप्रमाणे भासणारी आणि तितकीच सहजतेने अवगत होणारी आहे. बसं ती सहजता आपल्यात अवगत करायला शिकले पाहिजे आणि त्यात फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीचे बोलणे असायला हवे. नात्यांमधली हि सहजता ज्यांनी कोणी हेरली, कि मग ती नाती शेवटपर्यंत आपलीच असतात.

   ग्लोबलाईझेशनच्या युगात जग एवढे जवळ आले आहे कि माणसाला आता प्रत्यक्षातला संवादाची गरज वाटत नाही. कारण त्याची हि संवादाची जागा आता मोबाइलच्या दुनियेने व्यापली आहे. मोबाइल म्हणजे जिवंत माणूसच आणि ऑपेरेटिंग सीसटम. जशी नवीन ऑपेरेटिंग सीसटम लौंच होईल तशी जुनी फेकून द्या. भयानक वाटतात ना हे विचार सुद्धा? खरच हे सत्य प्रत्यक्षात येण्याआधीच आपण आपल्या नात्याला जगवूया पुन्हा नव्याने खतपाणी घालून. कारण नाती हि पैश्याने विकत घेता येऊ शकत नाहीत. माणूस एकदा निघून गेला ना  कि तो पुन्हा भेटत नाही. त्यामुळे आपल्या माणसांना जपुयात, त्यांची काळजी घेऊयात. शक्य तितका वेळ स्वतःला आणि आपल्या जिव्हाळाच्या नात्यांना देऊयात, नाती जपुयात......
कारण एकाच नाती अनमोल असतात.......
अनामिक (PMJ)

Saturday 23 September 2017

माझ्या नजरेतून श्रध्दा भक्ती.......


माझ्या नजरेतून श्रध्दा भक्ती....... 

"मी कधीच नाही म्हंटले कि तू दे मज दर्शन" ही दर्शन नावाची कविता शाळेत असतांना खूप छान पाठ होती यात कवी म्हणतात हे ईश्वरा जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये मला तुझं दर्शन होतंय, मग तुला वेगळं दर्शन मी काय मागू ? कविता शिकत असतांना त्याचा फारसा अर्थ कळाला नाही पण आता कळतोय. गणेशाला शमीपत्र, महादेवाला बेल, दूध, खुपसारी फळ, आणि वाट्टेल तितकी फुल हे त्याचच त्याला देऊन मी त्याच्याकडे काय मागते? माझं सुख की नैसर्गिक साधन संपत्तीचं नुकसान आणि माझ्याच भविष्याचं नुकसान?

झाड तोडू नये मोठ्या आवेगान म्हणतो आपण, पण भविष्याशी तरदूत म्हणून एकतरी झाड जगवतो का आपण? नुसतच म्हणायचं झाडे तोडू नका, पण बेलाची १०८ पान तोडल्याशिवाय मन भरत आपलं?
गणेशाला दुर्वा तर हव्यातच अरे पण त्याला सुंदर सृष्टीदेखील हवीय हे नाही लक्ष्यात येत. 
हेच आणि इतकच नाही त्याहीपलीकडे खूप गोष्टी अश्या आहेत कीं ज्याच्याकडे आपलं लक्ष्यच जात नाही तरी देवा मला पाव ही भक्ती?, ही श्रध्दा म्हणावी का ?
कुठेतरी वाचलेली एक सुंदर गोष्ट मला आज आठवतेय....

एक दिवस शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणे म्हणजे अभिमान वाटायचा) त्यांनी वर्गातील एका नवीन विद्यार्थ्यास उभे केले.

प्रो. : तर तुझा देवावर विश्वास आहे का?
वि. : हो निश्चितच सर..
प्रो. : देव हा चांगला आहे?
वि. : हो सर
प्रो. : देव हा सर्व शक्तिमान आहे?
वि. : हो सर अर्थातच ..
प्रो. : माझा भाऊ कॅन्सरने वारला त्या आधी त्याने देवाची खुप प्रार्थना केली. आपल्यातला कोणी आजारी असतो तेव्हा आपणही त्याच्या मदतीला धावतो मग देवाने का मदत केली नाही? का देव चांगला नाही? (सर्व वर्ग शांत झाला). कोणीही याचे उत्तर देऊ शकत नाही. बरोबर? ठीक आहे मित्रा मी अजून काही विचारतो.'
प्रोफेसर पुढे बोलू लागले.
प्रो. : राक्षस चांगले आहेत?
वि. : नाही सर ..
प्रो. : कोणी बनवले यांना देवानेच ना.?
वि. : हो सर...
प्रो. : दृष्ट आत्मा किंवा लोक ते चांगले आहेत?
वि. : नाही सर ..
प्रो. : त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?
वि. : हो सर...
प्रो. : या जगातील आजारपण,अमानुषता, दु:ख, कुरुपता या सर्व वाईट आणि भयानक गोष्टी जगात आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?'  (विद्यार्थी शांत होता) प्रोफेसर पुन्हा म्हणाले.
प्रो. : विज्ञान सांगते तुम्हाला ५ ज्ञानेंद्रीय आहे ज्याने तुम्ही आजूबाजूचे जग समजून घेऊ शकता. सांग मित्रा तु कधी देवाला पाहीलेस?
वि. : नाही सर ...
प्रो. : कधी देवाला ऐकलेस? स्पर्श केलास? कधी चव पाहीलीस? अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान आले आहे?
वि. : नाही सर... असे काहीही नाही.
प्रो. : मग निरीक्षणार्थ,परीक्षणार्थी विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पना अस्तित्वातच नाही. मग याला तु उत्तर काय देशील?
वि. : मी म्हणेन माझी श्रद्धा आहे.
प्रो. : हो यस, श्रद्धा आणि ईथेच विज्ञानाचे घोडे अडते. माणुस विचार करणे सोडतो. आणि सगळे श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो.
वि. : माफ करा सर. मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का?
प्रो. : अवश्य ...
वि. : सर उष्णता नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? .
प्रो. : हो आहे ना.
वि. : आणि शीतलता?
प्रो. : हो अर्थातच ...
वि. : नाही सर.. असे काहीच अस्तित्वात नाही.(वर्गात एकदम पिनड्रॉप शांतता झाली) सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शुन्य डीग्रीच्या ४५८ डीग्री खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेत उष्णतेची कमतरता म्हणजे शीतलता.' (वर्ग लक्षपुर्वक ऐकत होता)
वि. : अंधाराबद्दल काय मत आहे सर आपले. ते अस्तित्वात आहे?
प्रो. : हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच ना?
वि. : तुम्ही पुन्हा चुकत आहात. आपले तर्कशास्त्र थोडेसे चुकीचे आहे .
प्रो. : कसे काय सिद्ध करुन दाखव.
वि. : जर आपण सृष्टीच्या द्वैततत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात.
विज्ञान हे केवळ डोक्यात येणारे विचारही कसे असतात हे विश्लेशीत करु शकत नाही. ज्या विचारांबद्दल विज्ञान सर्वोच्च नोबेल पारीतोषिक देऊन सन्मान करते. जरा विचित्र नाही वाटत? .
विज्ञान चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करते त्याचा उगमस्त्रोत माहीत नसुनही हे वेडेपणाचे नाही वाटत ... मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही .. फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु.
सर आपण ही गोष्ट मानता का की आपण माकडांचे वंशज आहोत ..
प्रो. : हो मी मानतो ..उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा.
वि. : मला सांगा सर आपण ही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली? नाही. मी ही नाही याचा अर्थ असा होतो का की आपण अजूनही माकडच आहोत ... (सर्व वर्गात हशा पिकला)
सर शेवटचा प्रश्न मी क्लासला विचारतो .. तुम्ही कधी प्रोफेसर सरांचा मेंदू पाहीलाय ... कधी चव घेतलीय कधी स्पर्श केलाय? नाही ना? माफ करा सर मग आम्ही तुम्ही जे शिकवता ते खरे आहे हे आम्ही कसे समजून घेऊ?
प्रो. : Well त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..  (आता प्रोफेसर हासत होते. पहील्यांदा त्यांना तोडीस तोड कोणीतरी भेटले)
वि. : एक्झॅक्टली .. सर .. देव आणि माणुस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा ...दुर्दैव..म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरे काही नाही.... (सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या) पुढे जेव्हा जेव्हा हा विद्यार्थी बोलला तेव्हा तेव्हा त्याने लाखो Minds Ignite केले. करोडो ध्येयवेड्या माणसांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी 'Wings of Fire' दिले .. हा विद्यार्थी म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम ...
याला म्हणूयात खरी श्रध्दा खरी भक्ती आणि त्यातली शक्ती....... ती देवाला काही देऊन, नवस करून नाही मिळत.त्यासाठी श्रद्धाच ठेवावी लागते.
अनामिक (PMJ)

Friday 22 September 2017

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....

यशाचं कारण ठरेल नात्याचं सर्व्हीसिंग.....
   गाडी एकदा घेतली की ती आपली आणि आपलीच राहणार चांगलीच राहणार हि अपेक्षा व्यर्थ आहे. त्यासाठी गरज असते ठराविक काळानंतर त्याच्या सर्व्हीसिंगची.  नात्यांचं असंच असतं त्याला सतत ताजेपणा लागतो तुम्ही एकमेकांसोबत किती वर्ष राहिलात यापेक्षा महत्वाचे ते तुम्ही एकमेकांसाठी काय आहात आणि किती आहात. 
   खरंतर नाती Live-in असतात. महत्वाचं असतं तुमच्यातील नातं एकमेकांसाठी किती आहे. की ती फक्त अपरिहार्य केलेली सोबत आहे! नात्यातला गोडवा तोपर्येंत असतो जोपर्येंत तुम्हाला एकमेकांची ओठ आहे एकमेकांविषयी विश्वास आहे नात्याला सतत ताजेपणा लागतो नावीन्य लागत. तुम्ही केवळ बरोबर राहता म्हणजे तुमच्यात प्रेम असेलच असं नाही ते प्रेम वाढत राहण्यासाठी सतत काहीतरी करावं लागत म्हणू तुम्ही एकमेकांसाठी काय आहात किती आहात आणि कोण आहात ते महत्वाचं .......

    अनिल अवचट यांचे "स्वतःविषयी" हे आत्मचरित्य बायको सुनंदाला अर्पण करतांना ते लिहितात " हे पुस्तक अर्पण करण्यासाठी तुला माझ्यातून काहीकाळ बाहेर काढावं लागलंय त्यासाठी थोडी रुखरुख होतेय " या ओळीतून त्यांचं एकमेकांसाठी असणं म्हणजे काय ते कळत.

    माझ्या एक मैत्रिणीचं मला नेहमी औत्सुक्य वाटत काय असेल तीच आणि तिच्या आहोनं मधील नातं पूर्वी लग्न झालेलं असतांना आणि आपल्याकडे कायम दुसरेपणा येणार हे माहित असूनही एकत्र येण्याचा त्यांचा निर्णय नक्कीच सोपा नसावा, पण त्याहीपेक्षा सोपं नव्हतं १५ - २० वर्ष हे नातं टिकवणं ती आजही नवऱ्याचं नाव घेतांना जे लाजते ना ते आत्ता लग्न झालेली मुलगीदेखील लाजणार नाही.

   मला वाटत तुम्ही एकमेकांबरोबर किती काळ राहता यापेक्षा महत्वाचं आहे तुमच्यातला वेळ तुमच्यातील प्रेम वाढवतोय की नाही ते ! अन्यथा परदेशी किंवा परगावी नोकरीला असतांना काही आठवडे, काही महिने,एकमेकांचं तोंडही न पाहणारी जोडपी सुखानं नांदलीच नसती.

   मान्य आहे की आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला इतरही अनेक व्यवधानं आहेत स्वतःच अस्थित्व टिकवायचं आहे स्वतःला सिध्द करायचं आहे पण तुमच्यातल्या नात्याचा बळी देऊन जर हे सिध्द करायचं असेल तर त्याचा आनंद ना धड तुम्ही घेऊ शकाल ना इतर.....

   कुणी कुठल्याही नामवंत व्यक्तीला त्यांच्या यशाचं कारण विचारा, मेहनत तर आहेच पण त्याहीपलीकडचं मानसिक समाधान महत्वाचं आणि ते घरातून मिळत असंच उत्तर तुम्हाला मिळेल नवरा बायको म्हणून तुमच्यातलं नातं जर परिपक्व नसेल तर ?

   तुम्ही कायद्याने एकत्र आहेत की नाही या पेक्ष्या महत्वाचं आहे ते तुम्ही मनाने एकमेकांचे आहेत कि नाही आणि म्हणून मघाशी म्हटल्याप्रमाणे गरज आहे ती नात्याला वेळ देण्याची नात्याच्या सर्व्हीसिंगची नात्याला भरभरून वेळ द्या त्याला फुलू द्या तुम्ही खूप खूप आनंदी राहाल आणि तुमचा आनंदच तुमच्या यशाचं कारण ठरेल.

Hum Hain Iss Pal Yahan, Jaane Ho Kal Kahan
Hum Miley Na Miley, Hum Rahey Na Rahey
Rahegi Sadaa Yahan, Pyar Ki Ye Dastan
Sunenge Sadaa Jise,Yeh Zameen Asmaan 


अनामिक (PMJ)

Thursday 21 September 2017

शोधूयात आजच्या चांगल्या गोष्टी.............

शोधूयात आजच्या चांगल्या गोष्टी.............



   रोजच्या जीवनात बरेच वेळा असं वाटतं की आपल्या मनासारखं काहीच होत नाही. होतील असं वाटणारी कामं ठप्प पडतात, अडकतात. कितीही प्रयत्न केले तरी ज्या गोष्टी व्हायच्या असतात त्या होत नाहीत. मग निराशा येते, राग येतो आणि आपली खूप चिडचिड होते. आपण रागावलो की तो राग मित्रांवर किंवा घरच्यांवर काढला जातो. मग राग गेला की आपल्याला वाईट वाटतं, आपण त्यांची क्षमा मागतो आणि ते आपल्याला माफही करतात. पण बोललेले शब्द परत घेता येत नाहीत. आपण ज्या कारणामुळे चिडलो होतो ती गोष्ट शुल्लक वाटू लागते.
   असं झालं की मला एक गोष्ट आठवते. एक माणूस देवाचे आभार मानत असतो. तो म्हणत असतो की "माझ्याकडे नवे बूट नव्हते म्हणून मी दु:खी होतो त्या वेळी तू मला एक माणूस दाखवलास ज्याच्याकडे पाय पण नव्हते. मग माझी तकरार आपोआप मुकी झाली." थोडक्यात सांगायचं तर आपण छोट्या दु:खांकडे लक्ष देऊन त्यांना मोठं करतो पण छोट्या सुखांकडे लक्षच देत नाही. जसं बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे तशा होत नाहीत, तसं त्याहून कितीतरी जास्त गोष्टी आपल्याला खुश करायचा प्रयत्न करत असतात. पण आपल्या एक लहानशा दु:खाच्या नादात आपण त्या दहा खुश करणाऱ्या गोष्टींना विसरतो.

   जर आतापर्यंतचे विचार पटले असतील, तर मनात एक प्रश्न पण आला असेल. आपण या लहान सुखांकडेलक्ष कसं द्यावं? काही मनासारखं नाही झालं तर त्याला पटकन मनातून बाहेर काढून जे आपल्याला सुख देतं ते कसं करावं? याचं उत्तर माझ्या एका मैत्रिणींकडून मला शिकायला मिळालं. आमची मैत्री जशी वाढू लागली तसं त्यांनी मला एक मजा सांगितली. त्या म्हणाल्या की आम्ही एकामेकांशी बोलायला लागलो की 'आजची चांगली गोष्ट काय?' असा प्रश्न विचारायचा. प्रश्न सोपा आहे पण पहिले काही दिवस मला नीट उत्तरंच देता येत नव्हतं. मी 'आजची चांगली गोष्ट काही नाही' आसं म्हटलं की त्या 'काहीतरी असेल, नीट विचार कर' असं म्हणायच्या. मग मी काहीतरी छोट्यातलं छोटं छान आहे म्हणून सांगायच. त्या पण साध्या सोप्या गोष्टी 'आजची चांगली गोष्ट' म्हणून सांगायच्या. पण काही दिवस हा प्रकार सुरू राहिला आणि मला लहानातल्या लहान गोष्टी पण 'आजची चांगली गोष्ट' वाटू लागल्या.

   आज एका दुकानात मस्त कॉफी प्यायली, आज मस्त आठ तास गजर न लावता झोप झाली, आज अचानक एक जुना मित्र भेटला अशी आमची उत्तरं येऊ लागली. मग त्यांच्या प्रश्नाचा खरा अर्थ लक्षात आला. जसं आपण लहान दु:खांकडे लक्ष देतो तसं या प्रश्नामुळे आम्ही लहान सुखांकडे लक्ष देत होतो आणि कोणालातरी सांगितलं की ते सुख परत मनात यायचं. मग 'आजची चांगली गोष्ट'च्या ऐवजी 'आजच्या चांगल्या गोष्टी' अशा वाढू लागल्या. खरंच दिवसातल्या वाईट गोष्टी या चांगल्या गोष्टींसमोर शुल्लक वाटू लागल्या. आता तर मी स्वत:ला हा प्रश्न रोज झोपायच्या आधी विचारतो. गेलेला दिवस संपवताना त्यांतली एकतरी चांगली आठवण परत जगली पाहिजे. अशा छोट्या सुखांकडे नीट लक्ष दिलं तर एक एक करून सगळेच दिवस मजेत जाऊ लागतात.

   तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. जसं आपण बंद असलेल्या मंदिरासमोरून जाताना पण 'आत देव आहे' या विश्वासाने नमस्कार करतो, तसं या प्रयोगावर पण विश्वास करून बघा. अट फक्त एकच, की तुम्ही 'आजची चांगली गोष्ट काय?' या प्रश्नाला काहीतरी उत्तर दिलंच पाहिजे. हा प्रश्न स्वत :ला तर विचाराच, पण आपल्या मित्रांना किंवा घरातल्या व्यक्तिंना विचारा. उत्तर कितीही
शुल्लक वाटलं तरी नीट ऐका, तुमचं उत्तर पण सांगा. बघा तुम्हाला पण मस्त वाटेल आणि तुमच्या मित्रांना पण. हा प्रश्न खूप बाळबोध वाटतो, किंवा मित्र चेष्टा करतील असं वाटत असेल तर आधी काही दिवस स्वत:लाच विचारा. मग एकदा तुम्ही रोजच्या दिवसाचा आस्वाद घेऊ लागलात की मित्रांना विचारा 'आजची चांगली गोष्ट काय?'

   आता शेवटी मी मला आवडणाऱ्या काही साध्या-सोप्या गोष्टी लिहीतो. खाण्यावरून सुरूवात केली तर तेलकट तरी आणि तिखट मिसळ, आईस-क्रिम, उन्हात फिरून आल्यावर उसाचा रस, पुण्यातली सुजाताची मस्तानी, पाऊस पडत असताना गरम गरम भजी, रात्री झोपायच्या आधी एक छोटं चॉकलेट, आईच्या हातचं जेवण, हापूस आंबा असे असंख्य पदार्थ आहेत. हे रोज एक एक करून खायचं असं ठरवलं तरी वर्षाच्या 'चांगल्या गोष्टींची' यादी होईल. रेडिओ वर अचानक लागलेलं आपल्याला आवडणारं गाणं, हे पण एक वेगळंच सुख आहे. त्यात ते गाणं थोडं जुनं असेल आणि आपल्याला त्याचा विसर पडत असताना ते लागलं तर मग अजूनच मस्त वाटतं. पहिल्या पावसानंतर ओल्या मातीचा सुगंध पण हृदयात सुकलेल्या भरपूर आठवणी परत ओल्या करून जातो. आपण नवी साडी किंवा नवा शर्ट घातला की होणारी प्रशंसा हे पण एक छोटंसं सुखच आहे. अंघोळ करून स्वच्छ झाल्यावर अंगावर मारलेलं अत्तर, आपल्याला दिवसभर त्याच्या सुगंधाने ताजंतवानं ठेऊ शकतं. अशा कितीतरी लहान वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला खूप आनंद
देऊ शकतात, जर आपण त्यांना आनंद द्यायची संधी दिली तर…
अनामिक (PMJ)





Wednesday 20 September 2017

तुला टाळणे, मला शक्य नाही

तुला टाळणे, मला शक्य नाही
तुझे भाळणेही, मी जाणते आहे,
कशी सावरू सांग माझ्या मनाला,
इथे थांबणे जाळणे होत आहे.......  
Anamika(PMJ)

Thursday 20 April 2017

जिसने चलना सीखाया,

जिसने चलना सीखाया,
उसीने सम्भलना भी सीखाया होगा.
मुश्किल है ये जिंदगी तो क्या हुआ ,
तुझे नया आसमा बनाना होगा....
अनामिका(PMJ)