Tuesday, 30 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  नववे-पुष्प.. विषय-आजी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
नववे -पुष्प.. 
विषय-आजी...
खरंतर आजी या नात्याबद्दल विशेष असा अनुभव मला वैयक्तिक नाही. या वटवृक्षाच्या छायेत फारस आलेलं आता मला आठवत नाही. पण त्या नात्याचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करूया.आजी म्हणजे आईची आई किंवा वडिलांची आई. आजी म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, तर ती कुटुंबातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आधारस्तंभ असते.तिचे प्रेम, तिच्या मायेची ऊब आणि तिने दिलेले मार्गदर्शन आयुष्याला एक नवी दिशा देते. घरात आजीच्या उपस्थितीमुळे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते, जी सर्व सदस्यांना एकत्र बांधून ठेवते. आजी म्हणजे कुटुंबाचा अनमोल खजिना. तिचा बटवा म्हणजे..काहीही झालं तरी डॉक्टर ची गरज नाही. तिची कुस म्हणजे दुसरा स्वर्गाच जणू..

नातवाचे रुसवे फुगवे आपल्या जादुई प्रेमाने चुटकी सरशी नाहीसे करणारी व्यक्ती म्हणजे आजी होय.
आजीचे नातवावरचे प्रेम असे म्हटले की संदीप खरे सरांच्या ओळी आठवतात..

काढल्या खस्ता केलेत कष्ट
'तू' म्हणजे त्या सगळ्याची 
शेवट गोड असलेली गोष्ट..

नुसतंच कथा पुराण झालं 
देव काही दिसला नाही 
कुशीत येतो तेव्हा कळतं 
कृष्ण काही वेगळा नाही....
        इतकं असीम प्रेम फक्त हीच माऊली करू शकते....

आजीच्या अनुभवांतून आणि ज्ञानामुळे नेहमीच योग्य सल्ला मिळतो. ती आपसूक आपल्याला मोठ्यांचा आदर करायला आणि आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कष्ट करायला शिकवते. तिच्याकडून शिकलेले संस्कार आणि तिने दिलेले संस्कार हे आपल्यासाठी खूप अनमोल असतात. आजीच्या कथेमुळे आणि तिच्या आठवणींमुळे कुटुंबाच्या भूतकाळाची आणि परंपरेची जाणीव होते.

तिच्यामुळेच कुटुंबाचे महत्त्व कळले. आजीचा स्पर्श, तिचे आशीर्वाद आणि तिचे प्रेम हे सर्वात मोठे धन असते ते सर्वांच्या वाटेला येतेचं असे नाही. आजोळची आठवण म्हटली की आता कोणाला सहज सांगता येत नाही जसे आपले आईबाबा सांगतात.

वेचीतं अनुभव पिढ्यांचे तिन्ही
अंधुक डोळे गातात गाणी
हट्ट सारे बाटव्यात तिच्या 
प्रत्येकासाठी वेगळी नाणी..

लहानां सोबत होते लहान 
मोठ्यानं सोबत अगदी मोठी 
हास्यात तिच्या विरघळतो काळ
मनात तिच्या हजार मोती..

थरथर पायी गाठी देऊळ
घेत नाव देवाचे ओठी 
दुःख टाळण्या आजी माझी 
सांज सभेला वाचे पोथी....
आपण सर्व देवीजवळ प्रार्थना करूया हे इतकं सुंदर नातं सर्वांच्या आयुष्यात नक्कीच असू दे.....
जय भवानी....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.


Sunday, 28 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  आठवे-पुष्प.. विषय-सासू...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
आठवे - पुष्प
विषय - सासू
     नमस्कार तस तर सासू-सूनेच नात: कधीही न उलगडणार कोडया सारखच असत. कालच्या लेखात आपण सूनेची भूमिका समजावून घेतली. आज सासूची समजून घेऊया... (सदर लेख माझ्या सासू लोकांनी मनावर घेऊ नये.🙏 हे लिखाण जगातील सर्व सासूच्या भूमिकेत असणाऱ्या महिलांसाठी आहे.😄)घरात मुलाचं लग्न झालं की आईची सासू कधी होते ते तिलाही कळतं नाही. प्रत्येक घरात सासूचं एक वेगळचं रूप पाहायला मिळत. कुठे ती खाष्ट कठोर, स्वभावाची, तर कुठे चंडीकेचा अवतार जणू, कुठे अगदी मवाळ, गरीब गाय जणू... गंमत पुढे आहे.. यांना सूना मात्र अगदी यांच्या विरुद्ध स्वभावाच्या मिळतात...का कुणास ठाऊक लग्नगाठ जशी स्वर्गात बांधली जाते तशी सासू सूनेची गाठ कुठे बांधली जाते कुणास ठाऊक?..
विशेष असे की, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सुचना नको. असे हे मजेशीर नाते जगावेगळेच असतं.

     खरंतर प्रत्येक सासू ही एकेकाळची सूनच असते. ती या सर्वातून आधी गेलेली असते. अनुभवी असते त्यामुळे आपल्याला संसार करतांना ज्या अडचणी आल्या त्या आपल्या मुलाला-सुनेला येऊ नये असे तिला प्रामाणिकपणे वाटत असते. प्रत्येकवेळी तिचा विचार वाईटच असतो असे नाही त्याउलट बऱ्याचदा तो सकारात्मक असतो. पण समाजाने सासू ही खाष्टचं असं लेबलचं जणू सासू नावाला लावल्यामुळे प्रत्येक सून आपल्या सासूला त्याच त्या चष्म्यातुन पाहत असते आणि मग नात्यांमध्ये खटके उडल्याशिवाय राहत नाही. 
थोडं तीन अन थोडं आपण समजून घ्यायला काय हरकत आहे पण असं होत नाही हे सासू सुनेन जाणलं पाहिजे.   

     सुनेनही सासूच्या छोट्या छोट्या गोष्टी माहेरी न सांगता सासूशी पारदर्शी चर्चा करावी मगच हे नातं खुलंत अन्यथा सासू वाईटच... त्यात आजकालच्या मुलींची तर कथाच वेगळी आहे "सासू सासरे नकोच"... मग सांगा? अनुभवाची शिदोरी येईल कुठून, त्या घरच्या परंपरा, सणवार, त्या घरातला पिढीजात संस्कार आपल्याला कोण सांगणार? पूर्वीपासून चालत आलेल्या कुटुंब व्यवस्थेला काहीतरी अर्थ आहे ना?. तो आपण समजून घेऊन त्याप्रमाणे आचारच केले पाहिजे. सगळं आपल्याच मनाने कस होईल? मग कुटूंबात राहणेच नको एकटेच राहूया... यावर येऊन थांबलंय सगळं पण यामुळे खूप अडचणी समस्या निर्माण होत आहेत. ज्या आपण शब्दात सांगू शकत नाही.

खरं सांगू सासूला काही काही नको असते 
फक्त एक सुशील सून लागते.

लेकच जवळची असते लेक चार घटका लागते 
सून मात्र मरेपर्यंत लागते.

माहेरवाशीण लेकीला चार दिवस खाऊ घालते आयुष्यभराची पोळी मात्र बाई सुनेकरताच ठेवते.

परक्याचं धन बोलून लेकीला बाई शंभर वेळा टोकते काहीही झालं तरी आपल्या घरची म्हणत सुनेला नेहमी माफ करते.

घरामधली प्रत्येक गोष्ट बाई लेकीवरच लादते 
मात्र सुनेची प्रत्येक गोष्ट तिच्याच कलेने घेते.

लेकीचं बाळंतपण करून बाई लगेच मोकळी होते 
सुनेच्या पोराला मात्र दुधावरच्या सायीप्रमाणे जपते.

कोण म्हणतं सुनेवर सासू अत्याचार करते ? 
सासू स्वतःची जागा सोडते अन ती तर सूनेलाच देते.

     सोपं नसत सासू होणं...आपला संसार सारा दुसऱ्या हाती देणं. म्हणून सासू या नात्याचा आईप्रमाणे आदरच करा बघा संसार सुखाचा होईल..

प्रेम जिथे नात्यापेक्षा मोठं असतं...
समजूतदारपणाच्या छायेत 
"सासू सूनेच" नातं खुळत....
जय भवानी.....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार. 

Saturday, 27 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  सातवे-पुष्प.. विषय-सून...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
सातवे - पुष्प
विषय - सून
  विवाहानंतर खऱ्या अर्थाने नात्यांचे दडपण येते. दोघांपैकी स्त्रीवर ते अधिक असते. वास्तविक प्रत्येकाचे आयुष्य स्वतंत्र असते व ते घडवण्याची प्रत्येकाला संधी असते. ते कसे व्यतीत करायचे? ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न असतो. नात्यांचे ओझे वा दडपण स्त्रियांवर अधिक असते. कारण त्यांना माहेर व सासर दोन्हीकडची नाती जपायची असतात. ती गृहिणी असेल तर ती ते सारे करेलही पण अलीकडे बहुतांश स्त्रिया पूर्ण वेळ गृहिणी नसतात कोणत्या न कोणत्याप्रकारे त्या स्वतःची ओळख तयार करण्याचा, आर्थिक स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण काम व  इतर जबाबदाऱ्यांमुळे ते प्रत्येकीस शक्य होतेच असेही नाही

   स्त्री च्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आणि परीक्षेची वेळच म्हणा ना! ही सूनेची भूमिका असते. त्यात प्रत्येकजण तिला न्याहाळत असतो. विशेष म्हणजे सासरची मंडळी.. मुलीची सून होताच तिला अनेक नात्यांना न्याय दयावा लागतो. त्यात सासू सूनेच नातं फार महत्वाचं मानलं जात. कधीकधी लोक गंमतीन म्हणतात ही, की "मुलामुलीची पत्रिका पाहण्यापेक्षा सासू सूनेची पहा " म्हणजे संसार सुखाचा होईल. कारण या दोन भूमिकेलीत स्रिया जर मिळून मिसळून राहिल्या तर आणि तरच संसार सुखाचा होतो.

   नवीन सुनेला अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. नात्यांशी परिचय करून घेताना, त्यांच्याशी जुळवून घेताना तिची दमछाक होते. ती केंद्रस्थानी असते व तिच्याकडून साऱ्यांच्याच आपापल्या कुवतीनुसार विभिन्न अपेक्षा असतात. वास्तविक ती नवीन घरात येते तेव्हा तिच्या मनातली द्विधा मन:स्थिती, संकोच, गोंधळ थांबवून तिला मानसिक निवांत करायचे सोडून ‘इकडच्या पद्धती, नियम, श्रीमंती, कुलाचार’ इ. सर्व बाबींचे तिच्यावर इतके दडपण आणले जाते की, लग्न करून आपण चुकी केली की काय? असे तिला वाटू लागते. 

    लग्न ठरवतानाच मुलींनी करियरबाबत नवरा मुलगा व त्याच्या कुटुंबाशी स्पष्टपणे बोलले पाहिजे. आधीच्या पिढीला त्या ‘शहाणपणाची’ परवानगी नव्हती पण आज आहे. मुलीची बुद्धिमत्ता, कौशल्य याचे मूल्य जाणणारे अपवादात्मक कुटुंबही असतात पण फार दुर्मिळ. सासरची नाती समंजस असतील तर ठीकच पण नसतील तर तिच्या विवाहित आयुष्यातील सुरुवातीची चार पाच वर्षे ताणतणाव यातच जातात आणि तिच्या प्रगतीलाही खीळ बसते. नाती गोंजारत बसू? की, ध्येयाकडे लक्ष देऊ? अशी दोलायमान परिस्थिती होते. 

   आधी सासरच्यांना माझ्याकडून काय हवे आहे हे तिने समजून घायला हवे. त्यात काहीवेळला खूपच माफक अपेक्षा असतात पण मुली त्याचा उगीचंच बाऊ करतात. म्हणजे उदाहरणं द्यायचं झालाच तर इतरांशी तुलना न करता त्यांना आपल्या संसारात समाधानाने वावरणारी सून हवी असते.दोघांचं आयुष्य बदलतं हे दोघांनी समजून घ्यायला हवं. सासू सासर्यांना मान मिळावा. मुठीत ठेवणारी मुलगी नाही तर आपलंस करणारी सून हवी असते. असं जर का ती मुलगी.. सून वागली आणि तिला तिच्या कुटुंबाची योग्य  साथ मिळाली तर मात्र ती संधीच सोन केल्यावाचून राहत नाही. सर्वाना अभिमाचं वाटेल असं ती वागते. आणि आपल्यातल्या कलागुणांनी सर्वांची मने जिंकून घेते. शेवटी तिला आयुष्यभर त्याच माणसांसोबत राहायचे असते आणि तेच तीच सर्वस्व असतात. 

मुलगा असला देव जरी, आशा कधीच फळत नाही.
सुख दुःखाच्या वादळात, तिची निष्ठा धळत नाही.
अशी सून सावली, सुख स्वप्न मनात असते 
सुनेविना न सावली, प्रत्येक घर उन्हात असते....

नाती टिकवायची असतील तर आपल्या भावना आणि अपेक्षा मोकळेपणाने व्यक्त करा. मग बघा आयुष्य सुंदर होईल....जय भवानी 🚩🙏
    अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.

Friday, 26 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  सहावे-पुष्प.. विषय-पत्नी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
सहावे - पुष्प
विषय - पत्नी
घराला घरपण आणणारी आणि स्वतःच्या प्रेमळ स्वभावाने, घराला स्वर्गाहून सुंदर बनवणारी स्त्री..
पत्नी, बायको, कारभारीण, मालकीण, घरधणीन, दारा, भार्या, वल्लभा, धवा, प्राणप्रिया, कांता, सहधर्मचारिणी, अर्धांगी, अर्धांगिनी, सती, त्रिणीता, गृहिणी, प्रणेश्वरी अश्या एक ना अनेक नावांनी संबोधली जाणारी लग्न झालेली स्त्री म्हणजे पत्नी होय. घराची लक्ष्मी, पतीची अर्धांगिनी, आणि कुटुंबाचा आधार असलेली स्त्री होय जिचे आपल्या पतीसोबतच त्याच्या परिवाराशी आयुष्यभराचे नाते जोडले जाते आणि ते ती शेवट पर्यंत नेटानी निभावतेही. 

हिंदू परंपरेत पत्नीला लक्ष्मी चे स्थान दिले जाते जी कुटुंबाचा आधार बनते आणि सर्वाना नेहमी एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करते. तिच्या येण्याने घराचे नंदनवन होते. पतीचे आईवडील, वडिलधारे, नातेवाईक यांचा ती नेहमी आदर करते नव्हे ते ती आपलें कर्तव्य समजते. घरातील सर्वांची आपुलकीने काळजी घेते ही तीला आपली जबाबदारी वाटते. 

प्रेम त्याग आणि परोपकाराच दुसरं नाव म्हणजे पत्नी.
स्वतःच अस्तित्व विसरून साखर जशी पाण्यात विरघळते ना अगदी तशीच सासरी विरघळून सासर गोड करणारी साखर म्हणजे पत्नी. 
कौतुक आणि कृतज्ञतेच्या गावी जाण्याचं स्वप्न न पाहता आजन्म यंत्रवत विनामूल्य सेवा देणारी महात्यागी म्हणजे पत्नी. 
पदरी पडलेल्या आणि नंतर पतीरुपी प्रियंकराला जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या कुशीतच आपलं अस्तित्व शोधणारी प्रेमळ प्रेयसी म्हणजे पत्नी. 
स्वतःच्या जीवनातून नवा जीव घडवणारी विश्वनिर्मिती म्हणजे पत्नी. 
उंबठ्याबाहेर पडल्यावर वेदना पिऊन सासरचे गोडवे गाणारी थोर स्त्री म्हणजे पत्नी. 
माहेरी गेल्यावर कायम सासरची ओढ असणारी माहेरची लेक म्हणजे पत्नी. 

हे नातं जरी जबाबदारी आणि कर्तव्य यात बांधलेलं असलं तरी जसजसा संसार होत जातो तसतस हे नातं अधिक अधिक खुलत जात आणि खूप सुंदर, गोड होत जात... त्यात खुपसाऱ्या  गंमतीजमती ही होत जातात. हे थोडक्यात सांगणारी ही कविता 

पत्नी जर नसेल तर, राजवाडा पण सुना आहे
पत्नीला नाव ठेवणं, हा गंभीर गुन्हा आहे...

वय कमी असूनसुद्धा, मुलगी समजदार असते 
पत्नी पेक्षा पतीचे वय, म्हणून जास्त असते....

खरं पाहिलं तर तिच्याशिवाय, पानही हालत नाही 
घरातलं कोणतच सुख पत्नीशिवाय खुलत नाही..

तिचा दोष काय तर म्हणे, चांगल्या सवयी लावते 
कुटुंबाच्या कल्याणासाठी दिवसरात्र धावते..

नोकरी अन पगाराशिवाय, पतीजवळ आहेचं काय 
तुलनाच जर केली तर सांगा तुम्हाला येत काय..?

चिडत असेल अधून मधून, सहनशीलता संपल्यावर
तुम्हीच सांगा काय होणार चोवीस तास जुपल्यावर?

स्वच्छ, सुंदर पवित्र घर, पत्नीमुळेचं असतं 
पती नावाचं विचित्र माणूस तिलाच हसत बसतं..

पत्नीची टिंगल करून, फिदी फिदी हसू नका
तिच्या यादीत मूर्ख स्थानी नंबर वन बसू नका...

असो थोडी गंमत या नात्याची, मनावर घेऊ नका....
असं सुंदर आणि गोड नातं तुमच्यापण आयुष्यात असू दे..
जय भवानी.....
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.

Thursday, 25 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  पाचवे-पुष्प.. विषय-प्रेयसी...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
पाचवे- पुष्प
विषय - प्रेयसी 
प्रेयसी हा शब्द प्रेमातील स्त्री साठी वापरला जातो. पण मुळात तो तिचा एक गुण आहे. "कश्यावरही प्रेम करणारी स्त्री म्हणजे प्रेयसी होय." मग ती व्यक्ती असो, वस्तू असो नाहीतरी कृती असो. मुळातच ती प्रेमळ, मायाळू, अती जीव लावणारी, जवळकी साधणारी, आपुलकी असणारी जिव्हाळा असणारी असते. प्रेयसी हा प्रत्येक स्त्री मधील एक सुंदर गुण आहे ज्याने ती प्रत्येकाला स्वतःशी बांधून ठेवते. थोडक्यात प्रेयसी म्हणजे प्रेम लावणारी स्त्री मग ती आई, पत्नी, मुलगी, बायको, आजी, मावशी, काकू, आत्या, मामी, सासू सून कुणीही असू शकते.

मग प्रेम म्हणजे काय?  तर प्रेम म्हणजे उत्साह, सळसळत  चैतन्य, दुसऱ्याला स्वीकारण्याची क्षमता, वासल्या, ममता, सकारात्मकता, शांत वृत्ती, एकाग्रता, आनंद, समाधान, निरागसता, निरपेक्षता, आत्म्याचा पवित्र हक्क, सुवर्ण पवित्र बंधन जे कर्तव्य आणि सत्याला जोडत. डोळ्यांना दिसत नाही पण आतून असतं.
प्रेम लाभो प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी....

प्रेम संशयमुक्त, त्यागयुक्त असतं 
समाजाच्या सहानुभूतीवर ते अवलंबून नसतं 
प्रेम कायम उमलत असतं उपजत असतं 
प्रेमाशिवाय जीवन स्मशान असतं 
फुलपाखराच फुलावर असतं 
आईच बाळावर असतं 
निसर्गाचा - माणसांवर असतं 
सावित्रीच - सत्यवानावर असतं 

हमे तुमसे प्यार कितना ये हम नाही जानते 
मगर जी नही सकते तुम्हारे बिना.....
हे गाणं प्रेमाच्या व्याखेत कधीच बसत नाही त्यात व्याकुळता आहे, वासना आहे, लोभ आहे, हव्यास आहे म्हणजे प्रेम नाही. 

आज काळ बदला आहे आणि प्रेमाची व्याख्याही खूप बदलत जातेय... आपण विचारच करू शकत नाही इतकी... एकदा एक राधा कृष्णाची फ्रेम बघून एका लेखिकेला एका छोटया मुलाने प्रश्न विचारला "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" त्या एकदम दचकल्या. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या त्यांच्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" आणि नंतर त्यांनी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.
मात्र त्या दिवसापासून त्यांना चैन पडत नव्हती. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना त्यांनी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून त्यांना असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ८ ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण ८ पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.

आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून त्यांनी खात्रीनी सांगितले की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले  ते असे होते...

१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!

4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते !!

एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेव्हा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -
'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '
आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

असो पण राधेसारखी प्रेयसी आपणा सर्वांच्या आयुष्यात नक्कीच येवो. जय भवानी 
     अनामिका (PMJ)
सौ. पुजा जहागीरदार.

Wednesday, 24 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  चौथे-पुष्प.. विषय-मैत्रीण...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
मैत्री तुझी नी माझी 
भेटायला कारण लागत नाही 
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही 
सुख दुःख वाटून घ्यायला सांगावं लागत नाही 
कारण मैत्री शिवाय आयुष्याला अर्थच उरत नाही....

असं हे अजून एक स्त्री चं अती सुंदर रूप, आणि नातं  म्हणजे मैत्रीण....
हे नातं आपण स्वतः निवडतो. जे आपल्याला रक्ताच्या  नात्यापेक्षा प्रिय असतं. दोन व्यक्तिमधील विश्वास, प्रामाणिकपणा आणि काळजी घेण्याची वृत्ती असलेले चं एकमेकांचे मित्र मैत्रीण होतात. हे नातं आपल्या खूप खूप जवळच आणि हक्कच वाटत ते तुटण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नाही म्हणूनच आपण त्यात खूप  मनमोकळेपणे वावरतो. हे असं नातं असतं ज्यात आपण चुकलो, रागावलो तरी आपली मैत्रीण नेहमी आपल्या सोबत असते आणि आपल्याला समजून घेते हे जरी असं असलं तरी एखाद्याचा खूप सहवास झाला म्हणजे तो किंवा ती आपली मैत्रीण झाली असे अजिबात नसते खरे पाहता मैत्री आणि सहवास यातला अन्योन्याश्रय फारच थोडा आहे. वाढत्या सहवासासोबत मैत्रीभाव अधिक परिपक्व होत जातो यात शंकाच नाही परंतु सहवास वाढला की स्नेह उत्पन्न झालाच पाहिजे असे नाही. 
त्याच प्रमाणे प्रशंसा व मैत्रिभाव या दोन भिन्न गोष्टी आहेत आपलें चुकते पाऊल जी फिरविते व जाणारा तोल जी सावरते ती खरी मैत्रीण..
खरी मैत्रीण सूर्यासारखी असते जिच्या सानिध्यात असतांना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा वाटत असतो तिच्या साथीने वावगं काही करण्याची भीतीचं वाटते म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात. 

पण इतक्यात छान मैत्रीला आपण कधी कधी गाफिल राहतो विशेषतः सेटल झाल्यावर, लग्न झाल्यावर 
काल एका खूप जुन्या मैत्रिणीचा फोन आला, मला म्हणाली "आपली ती अमुक मैत्रीण सोडून गेली आपल्याला " मी सुन्न झाले पुढे म्हणाली "मी यासाठी फोन नाही केला पण उद्या जर मीच फोन नाही करू शकले तर?  काय भरवसा, तिचा तो प्रश्न अजून अस्वस्थ करतोय.. मैत्रीत आपणही चुकतो गाफिल राहतो मग होतात गैरसमज आणि होतात फिके दोस्तीचे रंग मैत्रीतलं हे निसटत वळण आपल्याला दिसत पण तरीही आपला पाय  घसरतो आणि मैत्रीचा खांद्यावरचा हात सुटतो 

दोस्ती अगर गुनाह है तो होने ना देना 
दोस्ती अगर खुदा है तो उसे खोने ना देना 
करते हो अगर दोस्ती किसीसे तो सच्चे दोस्त के आंखो में कभी आसू आने ना देना 

म्हणून बोला, वेळ निघून जाण्याआधीच एकमेकांना भेटा, हक्क गाजवण सोडा. गृहीत धरू नका. आजच वेळ द्या.बोला मनात ठेऊ नका चांगल्या कामासाठी भक्कम पाठिंबा द्या. आदर आणि सन्मान करा. ठाम विश्वास ठेवा. अकारण स्पर्धा करू नका. अधिकार गाजवू नका
चुलतंय मग बोला 
या सर्व गोष्टी सांभाळा मग बघा मैत्रीण आयुष्यभराची सोबती होते आणि आयुष्य सोपं सोपं होत जात हे एक नातं तुमचं हक्काचं.. सर्वांच्या आयुष्यात असं सुंदर नातं नक्कीच असावं मैत्रीणीचं 
जय भवानी.... 🚩🙏
      अनामिका (PMJ)
✍️ सौ पुजा जहागीरदार

Tuesday, 23 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा" तिसरे- पुष्प.. विषय-बहीण..

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
तिसरे पुष्प... 
विषय - बहीण 

अप्रतिम आणि अनोख नातं बहिणीचं. मग ते भावाशी असो वा बहिणीशी खूप सुंदर आणि अनोख. छोटी असो वा मोठी एकतरी बहीण हवीचं! आई वडिलांनखेरीचं जर कोणतं घट्ट नातं असेल तर ते बहिणीचं

आईची सावलीच जणू आणि मोठी असेल तर विचारूच नका तिचा तोरा, दरारा, आईबाबांची खूप लाडकी लेक तिच्याशिवाय घरातलं पान देखील हलत नाही. पण मोठी असूनही मोठं प्रेम अन मोठीच माया देणारी..

मनात ठेवण्याऐवजी मन मोकळं करण्याची..
हक्काची जागा म्हणजे बहीण....

कोणत्याही परिस्थितीत साथ देणारी, वाट दाखवणारी, पाठीशी " मी आहे" असं म्हणत खंभीरपणे उभी राहणारी. आपल्या गुणांचं तोंडभरून कौतुक करणारी. प्रसंगी चूक झालीच तर आईबाबांचा स्वतः ओरडा खाणारी. सांभाळून घेणारी, अवगुणांवर शिताफिने पांघरून घालणारी. बाजू घेऊन भांडायला सदैव तत्पर असणारी. "माझा भाऊ" अशी ओळख करून देतांना तिचा चेहरा अभिमानाने दावरलेले असतो. तीच अख्ख माहेर त्या एका भावात ऐकवटलेल असतं.

नेहमी भांडूनही कधीच न तुटणारं 
न बोलता सर्व काही समजून घेणारं 
एकमेकांची मनापासून काळजी घेणारं 
असं एकमेव नातं  भावा-बहिणीचं!....

लहानपणी सोबत सोबत असतो खूप भांडतो तिच्याशी तिची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू आपलीचं असते. पण मग लांब गेल्यावर तिची खरी माया आणि किंमत जाणवते. बहिणी-बहिणी असू देत नाहीतरी भाऊ-बहीण खरी किंमत दूर गेल्यावरच एकमेकांना कळू लागते. दूर गेल्यावर या नात्याचा गोडवा अधिक वाढू लागतो. म्हणूनच कदाचित आपल्या संस्कृतीत या सुंदर नात्यासाठी दोन खास सण आहेत. राखीपौर्णिमा आणि भाऊबीज ज्यात बहीण आपल्या भावाला आपल्या रक्षणाची जबाबदारी सोपवते आणि भावाला औक्षण करून त्याला दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना देवाजवळ करते. 
नवरा- बायको यांच्याखेरीच बहिणीचं हे एकच असं नातं आहे जे आपल्याला सदैव साथ देतं आयुष्यभराची.

कुठल्याही नात्यात नसेल एवढी ओढ आहे.
म्हणूनच बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.

देवा हे सुंदर नातं प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे...
प्रत्येक भावाला आणि बहिणीला एकतरी बहीण असू दे...
आयुष्यभरासाठी......जय भवानी🙏🚩

     अनामिका (PMJ)
✍️सौ पुजा जहागीरदार.


Monday, 22 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा" पुष्प दुसरे..विषय - कन्या...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
दुसरे पुष्प... 
विषय - कन्या
लेक चैतन्याचे रूप,लेक अल्लड चांदणं
लेक रंगांचे शिंपण,लेक गंध हळवं मन
लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा....
लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा....

असं म्हणतात नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला येते. पूर्वीच्या तुलनेत आता मुलीचे स्वागत घरोघरी मोठ्या आनंदाने केले जाते.
तिचा जन्म झाला की चिमुकल्या पावलांनी घराची शोभा वाढते. घरात लहान थोरांची वर्दळ वाढते. लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली असे वाटू लागते. हसण्याच्या किलकऱ्या घरात घुमू लागतात. तिच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाने घर हसू लागते.काठी टेकावणारी पंजी बालपणात हरवते. आजी आजोबा तर परत एकदा आपल्या मुलीच बालपणच जणू अनुभवतात. 

आई आणि मुलीच नातं तर खूपच खास असत दोघी एकमेकींच्या मैत्रिणीचं जणू. बाबा मुलीचा नातं म्हणजे दोघांच्या आयुष्याचा हलवा कोपरा, या नात्याबद्दल लिहिणारा गहिवराला नाही तर सांगा. अशी ही मुलगी, कन्या, लेक, पोर, छकुली, सुता, पुत्री, तनुजा, तनया, पोरगी, छोकरी घराचं नंदनवन करते. सर्वाना जीव लावते आणि एक दिवस आईवडिलांच घर सोडून पुढच्या प्रवासाला निघून जाते दुसऱ्या कुळचा आधार होण्यासाठी. हो पण स्त्री ची ही भूमिका काही सोपी नसते तिला त्यात खूप अडचनींचा सामना करावा लागते. पण तिने जर इथे तिच्या संस्कृती व संस्काराचा योग्य वापर केला तर ती दुसऱ्या कुळचाही उद्धारच करते.सर्वांची साथ मिळाली तर ती अख्ख कुटुंब सुंदररित्या चालवते, उभ करते, अन घडवतेही.

आजचा काळ प्रगतीचा आहे त्यात मुली खूप शिकू लागल्यात आणि मुले मुली समानता आली. मुली आर्थिकरित्या सबळ झाल्यात पण संस्कृती जपण्याची व संस्कार करण्याची, कुटुंब घडवण्याची जबाबदारी अजूनही मुलीचीच असते. नव्हे ति ती छान पार पडू शकते ती शक्ती तिच्यात उपजत असते. पण आता असे काहीसे घडत नाही असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पुढची पिढी उत्तम नागरिक घडेल का? यात थोडी शंका निर्माण होत आहे.
कारण मुलींना आजकाल खूप शिकून स्वतःच्या पायावर उभे रहायचे असते. त्यात चुकीचे नाही ते असलेच पाहिजे पण या सर्वात मुलींचे वय 30 वर्ष होते, मग लग्न मग मुले यात सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक घडी बिघडते आणि मग पुढील प्रवासात तिच्यासोबत सर्वांची खूप कसरत होते. 
या सर्वातून खूप नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत याचा विचार आणि त्यावर कृती करण्याची जबाबदारी तरुण मुलींवर व त्यांच्या पालकांवर आहे 
कारण समाज उभारणीच्या कामात लेकीची, मुलीची भूमिका खूप खूप महत्वाची आहे.
आई भवानी या सर्व मुलींना या स्पर्धेच्या युगात तारू दे योग्य मार्ग दे शक्ती दे....
जय भवानी 🙏🙏
     अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.

Sunday, 21 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"

शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा... 
"जागर स्त्री शक्तीचा"  नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....

स्त्री-शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून, जिथे जिथे तिची पूजा होते तिथे तिथे देवाचे अधिष्ठान असते हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. ज्या संस्कारांत आपण वाढलो ती संस्कृती, ते संस्कार जपले गेले पाहिजेत व तसे वागण्याची बुद्धी तिने सर्वांना दिली पाहिजे हीच तिच्याकडे प्रार्थना! हेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नऊ दिवस आपण स्त्रीच्या विविध रूपांची माहिती माझ्या छोट्याश्या लेखाच्या माध्यमातून वाचणार आहात.. 
"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....


प्रथम पुष्प... 
विषय - माता
न सांगता सर्व काही जाणते ती आई....
न मागता भरभरून देते ती आई..
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम मायेची पाखरण करणारी स्त्री म्हणजे आई..
आई, माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माऊली, जननी, माई, मा, मायडी, आय आश्या कितीतरी नावानी संबोधली जाणारी ती आई..
जी जन्म देते ती जननी आई बनते. तिचे खरे प्रेम आणि पालन पोषण याची कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही.आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्यावर भरभरून प्रेम करते. आणि आपणच तिच्यासाठी सर्वस्व असतो. तीच आपल्याला जगण्याची खरी कला शिकवते. उत्तम आदर्श व्यक्ती घडवते. 
कौसल्या, देवकी यशोदा, माता कुंती, मदालसा,अरुंधती, जिजामाता, हिरकणी, माँ शारदा उत्तम मातृत्वाचे असे कितीतरी उदाहरणे देता येतील 

आई हे दुर्गेचे रूप आहे. आणि आई मायेचा सागर आहे. आईची महती शब्दात मावणारी नाही म्हणूनच कवी यशवंत आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जागाचा आईविना भिकारी" असं म्हणतात.तर प्रभू श्री रामचंद्रानी स्वर्णमयी लंकेपेक्षा आपली जन्मभूमी, मातृभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. म्हणजे जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे ते म्हणतात.. " जननी जन्मभूमीश्च स्वर्गादापिगरियसी" याच विचारातून आपण आपल्या देशाला भारत माता असे म्हणत असू...

मातृत्व हा एक सुखद प्रवास आहे.मातृत्व हे स्त्रीला मिळालेलं सर्वश्रेष्ठ वरदान आहे.
आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आईचं स्थान हे अढळ आहे. बाळाची आई ही मृदू हाक ऐकण्याएवढं सुख अजूनतरी कशा कशात नाही.
ही दैवी देणगी आपली उत्तम नागरिक घडविण्याची जबाबदारी समजू या आणि सर्व जिजाऊ होऊ या....
जय भवानी....भारत माता की जय 🚩

      अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.